Tuesday, February 26, 2013

पुनःश्च किल्ले माहुली (Fort Mahuli Trek)

ठाणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला, माहुली. उंची सुमारे २८१५ फूट. माझ्या एका मित्राने २०१० साली हा किल्ला सुचवला, तिथे जायची योजना आखली, आणि आम्ही तीन मित्र तिथे ट्रेक ला गेलोही. पण काठिण्य पातळीचा चुकलेला अंदाज, पाण्याची कमतरता, शिवाय तापलेला सूर्य, अशा कारणांनी अर्ध्यातून परत आलो. पण तेंव्हापासून `माहुली' आमच्या अजेंड्यावर होता. २३ फेब्रुवारी २०१३ ची योजना फिक्स झाली. बघता बघता आठ जण जमलो आणि माहुली ला निघालो.

ठाण्यापासून ६१ किलोमीटर वर, शहापूर नजीक माहुली किल्ला आहे. नाशिक हायवे वर पडघा सोडताच डावीकडे ६-७ छोटे मोठे सुळके आपलं लक्ष वेधायला लागतात. एक आडवी पसरलेली ही डोंगररांग आहे. हा किल्ला बांधला कुणी याची खात्रीशीर नोंद इतिहासात नाही. शहाजी राजे, बाल शिवाजी आणि जिजामाता यांनी काही काळ इथे वास्तव्य केले आहे. पुरंदर च्या तहात मराठ्यांनी हा किल्ला गमावला. पुढे ३ वर्षात शिवाजी महाराजांनी एकंदरित २५० किल्ले पुन्हा काबीज केले, त्यात माहुलीचा समावेश होता. या आडव्या डोंगरावर खरंतर तीन गड आहेत, पळसगड, मध्यात माहुली, आणि भंडारगड. भंडारगडाच्याच बाजुला, नवरा-नवरी आणि भटजी, वजीर, नव-याची करवली, नवरीची करवली, अशी नामाभिधानं असलेले सुळके आहेत. हे ट्रेकर्स व रॉक क्लाईंबर्स ना आकर्षित करतात.


माहुली किल्ला तसा सोप्या श्रेणीत येतो. पण ट्रेक कठीण आहे. कठीण एवढ्यासाठी की सतत खडा चढ आहे आणि थांबायला मिळेल अशा किंवा जिथे पायांना आराम मिळेल अशा जागेचा अभाव. त्यामुळे कठीण नसला तरी दमवणारा ट्रेक आहे. अनुभवी ट्रेकर ला दोन ते सव्वा दोन तास पुरतात वर जायला. साधारण दीड्-पावणे दोन तास उतरायला. असा एक दिवसात होणारा हा ट्रेक आहे.


आम्ही सकाळी ९ ला पायथ्याशी पोहोचलो. चहा व मिसळ असं फ्युएल पोटात भरलेलं होतं. पायथ्याशी, विलास ठाकरे नामक व्यक्तीचं दुकान्/हॉटेल आहे. शिवाय गडवाटेची माहितीही ते आनंदाने पुरवतात. ९२०९५ २६२६८ हा त्यांचा भ्रमणध्वनी. गडाच्या पायथ्याशी असलेल्या देवळात गडाचा नकाशा आहे, त्याचा फोटो जरूर घेऊन ठेवावा. उपयोगी पडतो.



त्यांच्याकडून वाटेचा अंदाज घेतला आणि मार्गस्थ झालो. जे पटापट चढले त्यांना २ तास वरपर्यंत पोहोचण्यास पुरले. बाकीचे सुमारे ३ तासांनी पोहोचले. साधारण ४ टेकड्या पार करून गेलो की एक शिडी लागते. शिडी ब-यापैकी सुस्थितीत आहे. गड ८०% चढल्यावर पुढे २-३ कातळाचे पॅच लागतात. वरतून दिसणारा परिसर सुरेख आहे. हवेत फार ढग, धुकं, धूर नसल्यास तानसा जलाशयही दिसतो. पावसाळ्यात सगळा परिसर हिरवागार असतो. धबधबे वहात असतात. पण आत्ता उन्हाळ्यात मात्र निवडुंगांचं आणि रानफुलांचंच राज्य असतं.



वाटेत काही खत्राट स्पॉट लागतात. तिथून निसर्गाचं अप्रतिम दर्शन होतं.


गडावर विशेष काहीही उरलेलं नाही. गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक पाण्याचं मोठं टाकं दिसतं. त्याच्या डावीकडून पुढे गेल्यावर आपण एका मोठ्या वृक्षापर्यंत पोहोचतो. जिथून लगेच खाली आपल्याला कल्याण दरवाजा, व काही गुहा आढळतात. गुहा स्वच्छ नाहीत. गावातल्या किंवा गावाबाहेरच्या बेजबाबदार लोकांनी येऊन या गुहांमधे चिकन/दारू चे सॉलिड बेत केलेत, करतात, हे समजतं. शिवाय `स्वप्नील बदाम स्वप्नाली', `अजय बदाम मोना' अशा महान व्यक्तींचा उल्लेख गुहांच्या भिंतींवर आढळतो.


कल्याण दरवाजा भंगलेल्या अवस्थेत आहे. तिथे असलेल्या माहिती देणा-या फलकावरही आधुनिक कोरीवकाम केलेले आढळते. आपल्या इतिहासाबद्द्ल असलेल्या आस्थादारिद्र्याचं हे एक उदाहरण.


तिथे थोडा वेळ विसावून विलास ठाकरेंना फोन केला. भंडारगडावर जाऊन यायला किती वेळ लागेल त्याचा अंदाज घ्यायला. पण उरलेलं पाणी, उरलेला वेळ, सर्वानुमते उरलेला स्टॅमिना, हे लक्षात घेऊन पुढच्या खेपेला भंडारगड करू असं ठरवलं आणि परतीच्या वाटेला लागलो. उतरतानाही दोन फळ्या झाल्या, एक एक्स्प्रेस, दुसरी पॅसेंजर. सुमारे ५ पर्यंत सगळे जण खाली आलो. पायथ्याशी देऊळ आहे, आणि त्या बाजूला विहीर. विहिरीचं थंड पाणी काढून हात, तोंड धुतल्यावर सगळा शीण गेला आणि आम्ही पुन्हा ताजेतवाने झालो.


या आणि मागच्या ट्रेक च्या आठवणी काढत गाड्या हायवेला लागल्या. आता सोनेरी शाल पांघरलेला माहुली `पुन्हा या' असं सांगत आम्हाला अच्छा करत होता.

Wednesday, February 20, 2013

परका काळा घोडा

'मला ना, का कोणास ठाउक, इथे येऊन असं एखाद्या परक्या प्रांतात आल्यासारखं वाटलं.', माझी बायको म्हणाली. त्या वेळी, आणि त्या आधी तीन तास मला तेच वाटत होतं पण नेमक्या शब्दात मांडता येत नव्हतं.

दहावी झाल्यानंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत मित्रांबरोबर मुंबईला गेलो होतो तेंव्हाही हे असंच 'परक्या प्रांताचं' फीलिंग आलं होतं. पण तेंव्हा कुतुहल, उत्सुकता, या गोष्टी मोठ्या होत्या त्यामुळे ते तसं जाणवलं नाही. तिथली गर्दी परकी वाटली नाही, त्या गर्दीचा उबग आला नाही, गोंगाटाचा त्रास झाला नाही की काही नाही. या वेळी काळा घोडा कला उत्सवाला मात्र असं सगळं वाटलं. मन रमलं नाही.

आम्ही तिथे जायला उत्सवाचा शेवटचा दिवस निवडला होता. एक तर शेवटचा दिवस त्यात रविवार असं समीकरण होतं. मेगा ब्लॉक टाळावा म्हणून आम्ही गाडीने जायचं ठरवलं. मी, माझी बायको आणि माझी बहीण. अपेक्षेपेक्षा कमीच (आश्चर्यच!) वेळात आम्ही त्या इंग्रजांनी बांधलेल्या तरीही आपल्या 'सीएसटी' च्या इमारतीपर्यंत पोचलो. तिथून पुढे हुतात्मा चौकाजवळ एका गल्लीत गाडी पार्क करून आम्ही चालत काळा घोडा कडे निघालो.

एरवीपेक्षा त्या दिवशी तिथले पदपथ आणि त्यावर दुतर्फा असलेले विविध वस्तूंचे स्टॉल अधिक गजबजलेले होते. ‘शॉपर्स’ चा पूर आला होता. मग पुढे काळा घोडा उत्सवाचं मुख्य प्रवेशद्वार आलं. मित्राने फोन करून सांगितलं होतंच की 'तोबा गर्दी आहे'. पण प्रत्यक्ष बघून त्या 'तोबा' मागचा अर्थ कळलां. आणि तिथेच तेंव्हापर्यंत वाढत गेलेली उत्सुकता मावळायला सुरुवात झाली.


लाईनीत उगीचच मागून धक्के देणारी बेशिस्त मंडळी होतीच. लाईन म्हटली आपल्याइथे, की 'घुसे' आलेच. मग 'हम भी लाईन में खडे है बॉस...' असे काहींचे इशारे. एक परदेशी माणूस मेटल डिटेक्टर मधून जाताना त्याच्या खांद्याखालून एक व्यक्ती घुसू पहात होती. 'आर यू स्पेशल??? आर यू स्पेशल???' असं जरा रागाने विचारत त्याने त्याला मागे ढोसलं. आणि मग तो माणूस मागे बघून कुत्सित हसू लागला. एकंदरित आत कसं न्यूसन्स वालं पब्लिक असणार याची कल्पना आली. आत गेल्यावर एक सर्वसाधारण सर्वमान्य नियम म्हणून डावीकडून जायला व उजवीकडून यायला असे दर्शक फलक होते. पण नियम मानू, त्यांचा मान राखू तर आम्ही कसले ! त्यामुळे कुणीही कसंही कुठूनही येत होतं जात होतं. वर बरोबर जाणा-यांकडेच रागाने बघत होतं. आणि आम्हाला कळेना की आम्ही कुठे जावं.

माझ्या बाजूला एक आजोबा उभे होते. कलेचे जाणकार होते हे नक्की; कारण तिथल्या एका शिल्पाकडे ते फार निरखून बघत होते, त्याला अभ्यासत होते. आणि मागून एक मुलगा आला, त्यांना बाजूला लोटत सोबतच्या दोन फॅशनेबल मुलींना जागा करून देत म्हणाला, 'हिलते नही है जगह से; बंदर साले'. प्रचंड तिडीक गेली डोक्यात. ही कोण माणसं, कोणाला शिव्या देतायत? आणि कसल्या ताकदीच्या जोरावर? आणि हीच माणसं आहेत जिकडे तिकडे, मग आपली माणसं कुठं आहेत? मुंबईची माणसं कुठं आहेत? की हीच; मुंबईची माणसं आहेत? असा विचार माझ्या मनात थैमान घालतो तोच लोंढ्याच्या सोबत मी स्टॉल्स कडे पावलं टाकायलां लागलो. सेलिब्रिटी देवस्थानांमधल्या रांगेप्रमाणे 'बेबी स्टेप्स' टाकत पुढे सरकत होतो. एखाद्या स्टॉल वर वाटलं की थांबून जरा बघाव्या तिथे असलेल्या कलाकृती, तर तसं करणं महाकठीण होतं. स्टॉल्स तुडुंब भरलेले होते, आणि लोकांच्या प्रवाहाला थांबायचं नव्हतं. द सिटी दॅट नेव्हर स्टॉप्स ना बाबा.

तिथे एका स्टॉल वर वाया गेलेल्या होर्डिंग्स पासून बनवलेल्या पर्स आणि बॅग विक्रीस ठेवल्या होत्या. 'ए वाव ! ये तेरे पर्पल ड्रेस पे क्या जाएगा !' 'नही रे ये बहोत रॉ लगता है. उसपे लेदर ही चाहिये' तिथे उभ्या दोन मुलीं बोलत होत्या. ते ज्याने बनवलं होतं त्याच्या चेह-यावर हे स्पष्ट लिहिलेलं दिसलं की 'माझी कल्पना, कला, मेहनत याचं काहीच नाही !' प्रत्येक स्टॉलवर काहीसं हेच चित्र होतं. की कला किंवा त्या कलाकृतीमागे लागलेली मेहनत याला किंमत नगण्य होती.

'हां हॅलो कहां है? अरे क्या यार. आय अ‍ॅम अ‍ॅट काला घोडा इट्स ऑसम मॅन' असं मित्राला फोनवर सांगणा-याला काळा घोडा फेस्टिवल म्हणजे काय हे कळलंच नव्हतं. त्याला फक्त उद्या मित्राला, कलीग्स ना, जाउन सांगायचं होतं की मी काळा घोडा ला जाउन आलो. काही मुलं आपल्या ग्रूप बरोबर ‘सहलीला’ आली होती, काही स्त्रीया तिथे लग्नसमारंभासारखे भरजरी कपडे दागिने घालून मिरवायला आल्या होत्या, काहीजण असंच मॉल मधे जाऊन कंटाळा आला म्हणून आले होते. मग तिथे मधेच उभं राहून हातातल्या टिचभर मोबाईलने फोटो काढणं; शूटिंग करणं असे प्रकार चालू होते. एकूणच तिथे आलेल्या गर्दीत बहुतांश मंडळी आपल्या कलासक्ततेचा शो ऑफ करायला आलेली होती. बाकी जण त्या मंडळींच्या गर्दीच्या धक्क्यांना नम्रपणे दुर्लक्षित करून काळा घोडा कला उत्सव अनुभवत होते.

तिथली घुसमट काही वेळातच असह्य झाली. तसंही नीट पणे काही बघता, न्याहाळता येतच नव्हतं. गाडी गाठली आणि आपलं शहर गाठलं. गोष्टी हाईप केल्या ना, की असं होतं. असे उत्सव कमर्शियलाइज झाले, की संपलं समजायचं. त्या उत्सवाचा गाभा, आत्मा हा विरून जातो. मला तरी तसंच वाटलं या वेळी. घरी आल्यावर प्रश्न झाला, ‘कसा होता काळा घोडा?’ मी म्हटलं, ‘खूपच काळा होता.’